Tuesday, 26 November 2024

भारतीय संविधान दिन वगैरे..

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.. आपली प्रतिज्ञा..
लहानपणी यातलं आपल्याला काही कळत जरी नसलं तरी आजही हि प्रतिज्ञा आपल्याला तोंडपाठ आहे..
पण मग ज्या संविधानाने आपल्याला जीवन (हो जीवनच) दिलंय ते कधी कोणी पूर्ण वाचलंय का?? (किमान ऐकलंय का??)

आम्ही भारताचे लोक.. यापुढं काय हे आठवतही नाय..
असो, तर हे भारताचं संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर यांना हे संविधान लिहायला (म्हणजे फक्त लिहायला नव्हे तर भारतातील प्रत्येक सूक्ष्म घटकाचा अभ्यास करून लिहायला) २ वर्षं ११ महिने १८ दिवस लागले.. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी हे लिहून पूर्ण झालं आणि २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आणलं गेलं.. आणि या स्वतंत्र भारतातील आपण स्वैर नागरिक हे संविधान वाचण्यात एकही दिवस न घालवता 'आंबेडकरांनी किती भेदभाव केले' असं हेपलत (बोंबलत) सुटतो..

आपण स्वतः ला भारतीय म्हणवून घेताना यातल्या किमान काही महत्त्वाच्या गोष्टी आपण स्मरणात ठेवल्या तरी बाबासाहेबांचा सन्मान होईल..
आपल्या संविधानात ३९५ कलमे आहेत आणि हि सर्व २२ भागांत विभागली आहेत..
यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संविधानातल्या भाग ३ मधील कलम १९ अ नुसार प्रत्येक भारतीयाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.. (याचा गैरफायदा घेऊन आपण भारतीय फक्त दुसऱ्यांची बदनामी करतो हे वेगळं सांगायला नकोच)
भाग १ मधल्या १ ते ४ मध्ये केंद्र (म्हणजे भारत) आणि त्याचे प्रदेश (म्हणजेच राज्य) यांबद्दलच्या तरतूदी केल्या आहेत..
भाग २ या कलम ५ ते ११ मध्ये नागरिकत्त्वाबद्दल तरतुदी आहेत तर भाग ३ च्या कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत अधिकार सांगितले आहेत..
या मूलभूत अधिकारांमध्येही कलम २१ अ हे शिक्षणाचा अधिकार सांगतं, कलम २३ मध्ये मानवी तस्करी आणि सक्तीच्या कामगारांवर प्रतिबंध याबाबत लिहिलंय तर कलम २४ मध्ये बालकामगार प्रतिबंधाविषयी माहिती आहे..
यानंतर कलम ७८ मधल्या 'पंतप्रधानांची कर्तव्ये' वाचायलाही हरकत नाहीये..
कलम ३३५ नुसार अनुसूचित जाती आणि जमातींच्या सर्व्हिसेस आणि पोस्ट्सबाबतही वाचायला मिळेल..
आणि हक्कांसोबत येणारी कर्तव्यं कलम ५१ अ मध्ये दिलीयेत, तीही जमलं तर वाचायला हवीत..
कारण आपल्याला फक्त हे माझं ते माझं असं मागायची सवय झालीये पण त्या हक्कांपाठोपाठ आपली काय कर्तव्यं येतात हे कोणीच बघायला मागत नाय..
आपल्या संविधानात एका अखंड भूभागाला एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता आहे आणि हे फक्त वाचल्यावरच कळतं..
एक लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची खूप वैशिष्ट्ये आहेत आणि हि वैशिष्ट्ये लक्षात घेऊन ज्या मानवाने हे संविधान तयार केलंय त्यांना आज आपण पुन्हा त्याच जातीव्यवस्थेत गुंडाळून ठेवलंय..
भारत काय आहे हे संविधान वाचल्यावर कळतं.. आणि उगाच देशाच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनी तर नक्कीच हे वाचावं..
मातीत काम करणाऱ्या सामान्य नागरिकापासून देशाचा पहिला नागरिक असणाऱ्या प्रत्येकासाठी हे संविधान आहे आणि हो, आपल्यासाठीच आहे, आपलंच आहे..

तर मग या संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान निर्मात्याला आणि संविधानाला त्रिवार अभिवादन..

भारतीय संविधान चिरायू होवो..!!❤️

.
.
.
प्राchi.. 💞

Wednesday, 14 August 2024

ऐ वतन..

ना मैं धम्म जानती हुं
ना मैं मजहब जानती हुं
ना धर्म पता हैं
ना रिलिजन रखती हुं

जब से कुछ जाना हैं ऐ वतन मैं ने
तब से बस तिरंगे का इमान जानती हुं..

कुछ तो बात हैं उन तीन रंगों में
कुछ तो राज हैं इस के रुतबे में
हो खडी चाहे जहाँ में
नाम भी सुनु तो रूकना जानती हुं..

कुछ तो नशा होगा इस देस की मिट्टी में
युं ही नहीं वो शहीद हो गये
कभी याद भी करू उन को
तो सर झुकाना जानती हुं

मेरे वतन जानती हुं बस इतना ही मैं
के तुझ से बडा कोई दिलबर नहीं हैं मेरा
कभी मांग के तो देख मेरी जान
तेरे प्यार में कुरबान होना जानती हुं..
तेरे प्यार में कुरबान होना जानती हुं..

Saturday, 13 November 2021

बालदिन

बालपण म्हणजे तरी काय हो नक्की?
कुठं असतं हे बालपण नि कसं असतं?
मोठी लोकं म्हणून गेलीत की एकदा बालपण गेलं की ते पुन्हा कधीच परत येत नसतं.. 
पण मला तरी वाटतं की आपण कधीही आणि केव्हाही, किंबहुना रोजच बालपण अनुभवू शकतो.. गरज आहे फक्त दृष्टीची.. दृष्टीकोनाची..
या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि पैशांच्या युगात जर तुम्हाला मनासारखा चहा मिळाला म्हणून दिवस छान जात असेल, किंवा डब्यात एखादी आवडीची भाजी मिळालीय म्हणून तुम्ही लंच ब्रेकची वाट बघत असाल, आज घराबाहेर पडल्यावर ट्रॅफिक आणि गर्दी- वर्दळीचा विचार डोक्यात येण्यापेक्षा बाहेर पडायला मिळणार, रस्त्यांवर गाडी पळवायला मिळणार, झाडी आणि नवीन चेहऱ्याची माणसं बघायला मिळणार म्हणून जर खुश होत असाल तर तुमचा दिल तो बच्चा हैं जी!!
ऑफिसेस सुटल्यावर घरच्या कटकटी ऐकवण्यापेक्षा तुम्ही मित्रांसोबत टाळ्या मारून चहाचे फुरके घेत असाल तर अहाहा!! घरात असताना विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा आवाज आल्यावर पटकन डोकावून बघत असाल, रंगीबेरंगी फुलं बघितली की दिल डोळ्यांमध्ये येत असेल, चॉकलेट किंवा ब्राऊनी खाताना मस्त चाटून पुसून खात असाल, चवीने मोमोज आणि नूडल्स खाताना आपण कसे दिसतोय याचा विचार करत नसाल, दिवाळीच्या फराळात आधी चिवडा चकलीवर ताव मारत असाल, त्यातले काजू, शेंगदाणे, डाळ आणि खोबरं निवडून संपवत असाल तर बच्चे ही तो हो तुम!!
रोजच्या जगण्यात मरमर तर आहेच.. आणि अडचणी कुणाला नाहीत? पण म्हणून हिरमुसले चेहरे घेऊन जगण्यात मजा नाय.. छोटी मुलं जसं नावडत्या व्यक्तीकडे जात नाहीत तसं आपणही आपल्याला त्रास होणाऱ्या व्यक्ती नि वस्तूंपासून दूर राहायला काय हरकतेय? छोटी मुलं जसा रडून नकार देतात तसा आपण स्पष्ट नकार द्यायला का घाबरतो? बच्चू लोक जसं बिनधास्त कुठलीही गोष्ट करतात तसा धाडसीपणा आपण का नाय करू शकत? कारण आपण आपल्याभोवती आवरणं घालून घेतलीयेत शहाणपणाची, समजदरपणाची नि आपण मोठे झालो असल्याची.. उगाच स्वतःला हुशार नि so called समाजाच्या चौकटीत बसवून घेण्यासाठी धडपडतो आपण.. ही धडपड थांबली तर आपणही (म्हणजे तुम्ही) रोज बालदिन मनवू शकू.. खरं तर माझा तर रोजचा दिन बालदिन असतो.!! 
म्हणून तर मी म्हणते,
'अपना हर दिन ऐसें जियो, जैसें के आखरी हो.!!'😉

तर तुम्हा सर्वांना बालदिनाच्या चॉकलेटचा डब्बा भरून शुभेच्छा!!😍

तीच बालीश,
प्राchi!!❤️

Tuesday, 9 March 2021

महिला दिन विशेष.!!

तसं बघितलं तर जागतिक महिला दिन काल होता पण कालच्याच दिवशी या विषयावर लिहावं असा काही मी नवस केला नसल्यानं आज ही पोस्ट..

खूप जणांनी काल फोनवर, प्रत्यक्ष भेटून, मेसेजवर महिला दिनाच्या शुभेच्छांचा अगदी वर्षाव केला होता.. त्यातल्या बऱ्याच लोकांना अजूनही थँक्स म्हणता आलं नाहीये.. 

तर, आपण सगळी मंडळी जी काल प्रत्येक स्त्रीला शुभेच्छा देत होती, त्यातल्या एखाद्या स्त्रीने जर कधी तुमच्याकडे मदत मागितली तर तुमच्यातले किती लोक मदत करतील?
मदत या शब्दाचा अर्थ इथे आर्थिक मदत असा मुळीच नाहीये.. आणि फेबुवर 'ताई तुम्ही ह्यांव करा, त्यांव करा' अशा अर्थाचा तर त्याहूनही नाहीये..
 
आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या महिला अत्याचाराचे अनेक किस्से मी पाहिलेत.. तेव्हा अगदी महिलेला ग्राह्य धरण्यापासून ते तिला मारहाण करेपर्यंत सगळे प्रकार मला महितीयेत.. यात कुटुंब म्हणून वावरत असताना 'ही' आपल्यासाठी हे करेलच किंवा तिला करावंच लागेल ही मानसिकता अत्यंत नीच.. आणि त्यातही एखाद्याला आपल्या या मानसिकतेचा प्रचंड अनाठायी अभिमान असतो.. 
इथं त्या महिलेच्या 'का' या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं.. आणि जर उत्तर नाहीये तर नक्कीच ती घडणारी किंवा घडवून आणण्यात आलेली गोष्ट अन्याय आहे, अत्याचार आहे हे स्पष्टय.. 

घराणं, इज्जत, परंपरा, सन्मान, संस्कृती, ल** लसूण या अशा मोठमोठाल्या शब्दांची पाखडन करून आपण किती चांगले आणि 'ती' कशी नालायक हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो.. अशा परिस्थितीत कोण तिच्या बाजूने उभं असतं? तिच्या या अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं किंवा तिला प्रोत्साहन देणं हे माझ्या मदत या शब्दात अपेक्षित आहे.. 

अगदी चार घरची धुणीभांडी करणारी महिला किंवा लाखोंचं पॅकेज घेणारी एखादी अधिकारीण बाई असेल, प्रत्येक स्त्री यातून जातेच.. एखाद्या बोलणाऱ्या स्त्रीला कसलाही धाक दाखवून शांत करणं किंवा त्याहीपलीकडची ती असली तर वाट्टेल तसं वागवून, प्रसंगी मारून गप्प बसवलं जातं आणि यालाच आपली संस्कृती पुरुषार्थ म्हणते.. (?)

जे पुरुष आपल्या हक्कांचं हनन होऊ नये म्हणून भांडतात तेच पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीच्या हक्कांचा भंग करतात तेव्हा माझ्या मनात त्यांच्या पुरुष असण्यावर शंका उपस्थित होते..

आणि माझं फार पूर्वीपासून एक ठाम मत आहे की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचे हक्क काढून घेते.. यात थोडा भाग मानसशास्त्राचाही येतोच.. माझ्या पूर्वायुष्यात जर एखाद्या स्त्रीने मला छळलं असेल तर भविष्यात माझ्या हाताखाली येणाऱ्या स्त्रीलाही मी असंच छळणार अशा प्रकारची एक विकृत मानसिकता आपल्याला बघायला मिळते.. म्हणजे एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची शत्रू बनते. एखादी स्त्री जर तोंडावर खरं खोटं करणारी असेल तर तिला फाटक्या तोंडाची म्हणून हिणवताना मी पाहिलंय.. ती जर हुशार असेल तर दीड शहाणी समजतात आणि ती जर तिच्या कामातून बक्कळ पैसा मिळवून चैनीचं आयुष्य जगत असेल तर ही घाणेरडी मंडळी तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायलाही मागे हटत नाहीत..

मुळात, वेश्या व्यवसायातून सोडवून आणलेल्या महिलांसाठी मी काम करते तेव्हा त्यांच्याशी बोलताना त्यांनी कित्ती घाणेरडे दिवस काढलेत हे ऐकून वारंवार अंगावर काटा येतो.. आणि ती महिला गिऱ्हाईककडून जितके पैसे घेते त्यातले तिला किती मिळतात हे फक्त तिलाच माहीत.. त्यामुळं धंदा करून कुठलीही स्त्री चैनीचं आयुष्य जगू शकत नाय हे मी लिहून देऊ शकते.. 

अशा या समाजात लग्न नावाचा वेगळाच बाजार भरलेला असतो.. लग्न व्हायच्या पूर्वीची महिलांची घुसमट आणि लग्नानंतरची घुसमट यातला फरक काय तर गळ्यात काळ्या धाग्यांची एक माळ पडलेली असते जी तिच्या प्रत्येक कृतीवर कंट्रोल आणते.. लग्नापूर्वी किमान बोलण्याचं असलेलं स्वातंत्र्यही लग्नानंतर हरवतं आणि उरतं ते फक्त फुलांनी वेढलेलं काटेरी कुंपण.!!

माझ्या यादीतले किती पुरुष स्वखुशीने आपल्या घरातल्या महिलांना कामात मदत करतात ठाऊक नाय.. किमान बोटावर मोजण्याइतके तरी मिळावेत बाप्पा!! मला नेहमी वाटत आलंय की कुठलंही काम हे स्त्रीचं किंवा पुरुषाचं नसतंच.. ते माणसाचं असतं.. म्हणजे ज्याला भूक लागते त्याला स्वयंपाक यायलाच हवा.. ज्याला स्वच्छ घर आवडतं त्याला साफसफाई यायलाच हवी.. आणि ज्याला स्वतःला बाबा म्हणवून घ्यायचंय त्याला बच्चूचे डायपर बदलता यायलाच हवेत.. ज्याला जेवायची आणि कपडे घालायची इच्छा आहे त्याने भांडी घासायला आणि कपडे धुवायला लाजू नये आणि हे करायची लाज वाटत असेल तर जेवण करू नये आणि कपडे घालू नयेत.. 

स्त्रियांना नेहमी समान हक्क हवे असतात आणि पुरुषांना मक्तेदारी हवी असते हे चित्र मी लहानपणापासून बघत आलीये.. आज मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे जिथं माझ्याकडे संपूर्ण एक पिढी घडवायचं सामर्थ्य आहे.. इथं माझ्याइतकाच माझ्या लाईफ पार्टनरचाही घरातला रोल खूप महत्त्वाचा ठरतो.. त्याच्या पुरुषी अहंकारापायी जर त्याने असं सगळं करायला मनाई केली तर संपूर्ण एका पिढीचं कधीही न भरून येणारं नुकसान माझ्या हातून होण्यापेक्षा ती पिढीच जन्माला येऊ न देणं केव्हाही चांगलं असं मला वाटतं.. 

शेवटी इतकंच की कालच्या पेक्षा जास्त चांगला आजचा दिवस असो आणि आजच्या पेक्षा उद्याचा.. येत्या महिला दिनापर्यंत आयुष्याला अजून एखादं सुरेख वळण मिळालेलं असावं आणि प्रत्येक वेळी स्त्रीला समान संधी द्यायची भाषा करण्यापेक्षा ती सामर्थ्यवान आहे हे मान्य करून चाललो तर कदाचित समाज म्हणून आपण एक पाऊल पुढं गेलेलो असू.!!
आणि ज्यांना पटेल, झेपेल त्यांनीच हे घ्यावं.. बाकीच्यांना बाहेर पडण्याची अनेक दारं नेहमीच उघडी आहेत..

तीच ती हरामखोर,
प्राchi..💞

Wednesday, 13 May 2020

रम्य ती शाळा.. (भाग २)

http://prachisonawane12.blogspot.com/2020/05/blog-post.html (भाग १ ची लिंक)


मग पुढे बाईंनी आईला सांगितलंच.. पण माझी काजळ पावडरची चिंता बघून आई हसायला लागली..😬 आणि त्यानंतर कधीही मी रडत असले तर बाबा आणि आई मला म्हणायचे की अगं रडली तर तुझी पावडर पुसून जाईल.. आणि मी लगेच रडायचं थांबवायची..🙈 
तसं ना मला माझ्या बाबाने एक फळा आणि छडी आणली होती.. रोज शाळेतून आल्यावर मी माझ्या विद्यार्थ्यांना मी जे शाळेत शिकले ते शिकवायची.. माझे विद्यार्थी कोण? तर घरातली प्रत्येक फरशी म्हणजे माझा विद्यार्थी.. त्यात एक चिंटू (हा माझ्या आजोळी अंबरनाथला आजीच्या घराशेजारी राहणारा माझ्याच वयाचा माझा मित्र) दुसरी बबली (हे माझ्या आईचं माहेरचं नाव) आणि तिसरी बुजी (ही पण आजीच्या बाजूला राहणारी पण माझ्यापेक्षा खूप मोठी मुलगी) हे तिघे माझे आवडते विद्यार्थी होते.. मी सगळे प्रश्न याच तिघांना विचारायची आणि फटके द्यायचे असतील तर दुसऱ्या फरश्यांना (म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना) द्यायची..🙊 
मी माझ्या शाळेत जरी मराठीत शिकत असले तरी माझ्या विद्यार्थ्यांना मी हिंदीत शिकवायची.. कारण माझ्या भावाच्या जन्माच्या वेळी जेव्हा मी अंबरनाथला गेले होते तेव्हा पहिल्या दिवशी मला ती हिंदी भाषा समजतच नव्हती.. पण दोन दिवस फक्त दारात उभं राहून मी या हिंदी बोलणाऱ्या पोरांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होते.. आणि तिसऱ्या दिवशी मी त्यांच्यात खेळायला जाऊन त्यांच्याच हिंदी accent मध्ये बोलत होते.. माझे आजी आजोबा, आई बाबा तर थक्क झाले होते माझी दोन दिवसांत शिकलेली हिंदी बघून.. आणि म्हणूनच माझा प्रयत्न होता की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हिंदी यायलाच हवी..😊 
मग ही कुंभार गल्लीतली शाळा सोडल्यावर मला समर्थ शाळेत ऍडमिशन मिळालं नाय म्हणून गांधी मैदानातल्या मार्कंडेय शाळेत घातलं.. ती शाळा मंदिरात बांधलेली होती.. आजूबाजूला मंदिरं होती आणि खेळायला मैदान पण होतं.. मी तिथल्या बालवाडीत प्रवेश घेतला तेव्हा बघितलं की माझ्याएव्हढीच टाबरं (म्हणजे पोरं) शाळेत बोंबलत बसायची.. कोणी कोणी तर चड्डीत शी पण करून ठेवायचं..🙄 म्हणजे इतकी मोठी होऊन ही पोरं अशी कशी वागू शकतात हेच मला समजायचं नाय..😵 त्या बालवाडीच्या वर्गात एक सुविचार होता 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'.. पुढचं वाक्य काय मला समजायचं नाय पण फक्त तेल गळतंय एवढं समजायचं.. बालवाडीच्या मानाने ते पुरेसं होतं..😇
मग हे बालवाडीचं वर्ष संपलं आणि आम्ही पहिलीला आलो.. आम्ही म्हणजे मी आणि माझी गल्लीतली मैत्रीण ऐश्वर्या.. आमच्यापैकी कोण मोठं आहे हे आम्हाला माहीत नसल्याने आम्ही दोघी एकमेकींना तायडी म्हणायचो आणि अजूनही म्हणतो.. आम्ही खऱ्या अर्थाने लंगोट यार होतो आणि अजूनही आहोत.. तर आम्ही पहिलीला आलो आणि शाळा साडेसातला भरायला लागली.. माझे वांदे झाले.. कारण मी जन्मापासूनच अत्यंत झोपाळू प्राणी.. कोणी मला एकवेळ रात्रभर जागायला सांगितलं तर मी जागू शकते पण पहाटे सहा वाजता उठणं म्हणजे शरीरातून यमाने प्राण काढून घेण्यासारखं आहे..  मग मी रोज शाळेला उशिरा जायची.. एकतर सकाळी हळूच उठायचं.. मग हळूच ब्रश करायचं, मग सावकाश अंघोळ आणि मग हळूहळू चहामध्ये बिस्किटं बुडवून खायचं.. मग निवांत शाळेचं आवरून शाळेत जायचं.. आणि माझा बाबा मला चिडवायला 'आवराss थिगळेsssss' असं म्हणाला की मला जाम रडायला यायचं..😖 एकदा असाच खूप पाऊस पडला होता आणि मला उशीर पण झाला होता.. शाळेसमोर खूप पाणी आणि चिखल पण साचला होता.. मला उशीर झाला की बाबा कधीच वर्गापर्यंत यायचा नाय.. मग मलाच युद्धावर निघाल्यागत गेटपासून वर्गापर्यंत जावं लागायचं.. आणि त्या दिवशी तर वर्गाच्या दारात पण चिखल आणि पाणी साचलेलं होतं.. मी घाईघाईत आले आणि त्या पाण्यात पाय घसरून पडले..😕😓 च्यामारी आख्खा वर्ग मला हसला होता..!!😡 मला ते embarrassed की काय ते फील झालं होतं..🤕 डोळ्यातलं पाणी पण डोळ्याच्या कडांपर्यंत आलं होतं पण मला रडताना बघून अजून सगळे हसतील म्हणून मी रडणं दाबून ठेवलं होतं.. त्यात मला आधीपासूनच पहिल्या बेंचवर बसायची सवय होती आणि असला लोच्या झाल्यामुळं मला मागे बघायची पण सोय राहिली नव्हती..😏 
त्यावेळी मला वर्गशिक्षिका म्हणून श्रीगादी बाई होत्या.. पुढे चौथीपर्यंत त्याच वर्गशिक्षिका मला लाभल्या हे माझंच भाग्य.. मग दुसरीत आल्यावर माझ्या बाईंच्या लक्षात आलं की मी अभ्यास तर करते पण मी भित्री आहे आणि म्हणून सगळ्यांसमोर उत्तरं द्यायला घाबरते.. पण माझी मैत्रीण ऐश्वर्या उत्तर चुकीचं असो वा बरोबर, देऊन मोकळी व्हायची.. मी मात्र वर्गात उभं राहायला पण घाबरायची.. मग बाईंनी एक दिवस माझ्या आईला बोलावलं आणि म्हणाल्या, प्राची अभ्यास तर करते पण खूप घाबरते.. तुमच्या घरात कोणी strict व्यक्ती आहे का ज्याला ती घाबरते? तेव्हा आईने सांगितलं की तिचे बाबा खूप कडक स्वभावाचे आहेत म्हणून असं होतंय कदाचित.. पण आईने बाईंना विनंती केली की तुम्ही माझ्या मुलीचा भित्रेपणा घालवा.. मग बाईंनी मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावला.. ते काय असतं मला माहित नव्हतं पण बाई म्हणाल्या की जे तुला दिलंय ते तोंडपाठ करून ये.. बाईंची आज्ञा म्हटल्यावर मी शब्दनशब्द पाठ केला.. आणि त्या शनिवारी शाळेत स्पर्धा होती.. बाई म्हणाल्या, तुझं नाव आल्यावर तू जाऊन पाठ केलेलं तिथं बोलायचं.. अबे तिथं पहिली ते चौथीतले किमान 300 ते 350 पोरं अस्तेन बावा..!!😨 पण आता मी पळून पण जाऊ शकत नव्हते..😰 दोन तीन जणांचं भाषण झाल्यावर माझं नाव घेतलं आणि मी माईकसमोर आले.. समोर एवढे पोरं, मागे सगळ्या शिक्षिका.. आणि डोळ्यासमोर अंधार..😑 शब्दच पळून गेले होते डोक्यातून आणि तोंडातून.. बाई मला खालून म्हणत होत्या 'प्राची बोल, प्राची बोल..' आणि मला पहिली ओळच आठवेना.. पण नंतर अर्ध्या मिनिटाने मला पहिली ओळ आठवली 'अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो..'😍 आली भो आपली गाडी रुळावर..! मग जे धडाधड शब्द फेकले.. पण सगळे ढगात बघूनच..😆 कारण खाली कोणाकडे बघायची आपली हिंमत नव्हती.. एकदाचं भाषण संपलं.. मी खाली उरतले आणि माझ्या बाई एवढ्या खुश झाल्या की काय सांगू.. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं..!!🤗 त्यांनी मला पोटाशी घेतलं आणि शाबासकी दिली.. कसली भारी फिलिंग होती यार ती.. !!😘
नंतर बाईंनी मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं आणि बाईंची ती शाबासकी मिळवण्यासाठी मी पण प्रत्येक स्पर्धेत भाग घेत गेले.. मला जिंकणं महत्त्वाचं नव्हतं.. बाईंनी माझं केलेलं कौतुक मला हवंहवंसं वाटत होतं.. त्यामुळं 'टिचर के लिये कुछ भी' हे आपण ठरवून टाकलं होतं..😉
त्यानंतर..
.
.
.
.
.
.
प्राchi..💞
13/05/2020

रम्य ती शाळा.. (भाग १)

'जो सब करते हैं यारों, वो क्यूँ हम तुम करे..
युं ही नफरत करते करते, काहे को हम मरे?
घर वालों से टिचर से भला हम क्यूँ डरे??
यहां के हम सिकंदर, चाहे तो रख ले सब को अपनी जेब के अंदर..
अरे हम से बच के रहना मेरे यार..'

हे गाणं कित्ती जरी आवडीचं असलं आणि लहानपणी रोज म्हणत असले तरी आपली काय हिंमत नव्हती शिक्षकांशी आणि घरच्यांशी पंगा घ्यायची..😬
म्हणजे ना, आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यातले किमान 22 वर्ष शिक्षणात घालवले असतील.. आणि त्यातले 16 वर्ष शाळेत..😍
ही शाळा आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक.. मग तो घटक तुम्हाला आवडो वा न आवडो..😆 
माझ्याही आयुष्यात शाळेच्या मस्त आठवणी आहेत.. पण हा गेल्या 25 वर्षांचा प्रवास एका लेखात लिहिणं मुळीच शक्य नाहीये.. त्यामुळं किमान 3 ते 4 भागांत मी माझ्या शाळेच्या गमतीजमती मांडणारे.. 
हा विषय गेल्या 2 वर्षांपासून डोक्यात घोळतोय पण नेमकं काय लिहावं आणि कसं लिहावं ते समजत नव्हतं.. 
मी पहिल्यांदाच एखादा इतका मोठा लेख लिहायचा प्रयत्न करतीये.. पण हा फक्त लेख नाहीये.. या आठवणी आहेत..❤️ 
आयुष्यभराची शिदोरी.. तो फिर चलो फ्लॅशबॅक में..
साल 1997 - 98..🙊 
तशी माझी सगळ्यात पहिली ऑफिशियल शाळा म्हणजे दाभोळकर बाईंची शाळा.. त्यावेळी ती शनी चौकात होती.. आणि माझं वय असेल 3 - 4 वर्षं.. ती शाळा म्हणजे फक्त जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली घेऊन जायचं ठिकाण.. आणि मग दाभोळकर बाई आम्हाला मनाचे श्लोक, स्तोत्रं आणि प्रार्थना, बडबडगीतं शिकवायच्या.. माझा बाबा मला शाळेत सोडवायला यायचा आणि आई घ्यायला यायची.. पण तोपर्यंत शाळेत मजा असायची..
शाळेत मनाचे श्लोक म्हणत असताना मला काही ओळींचा अर्थ समजायचा नाय.. म्हणजे मनाचे श्लोक समजावेत इतकी मोठीही नव्हते म्हणा मी.. तरी तोडकेमोडके अर्थ लावून समजून घ्यायचा प्रयत्न करायची.. 
त्यातल्या,
'सदाचार हा थोर सांडू नये तो।
जनी तोचि तो मानवी धन्य होतो।।'
या ओळी म्हणताना माझ्याकडून एक घोळ व्हायचा.. मी 'थोर' ऐवजी 'मोर' म्हणायची आणि मग विचार करत बसायची की हा मोर काहीतरी सांडून येतो आणि तो धन्य होतो.. म्हणजे नेमका कसा आणि धन्य म्हणजे काय होतो?? आणि 'जनी तोचि तो' ऐवजी 'जनी टोचितो' असं म्हणायची.. म्हणजे तो काहीतरी सांडून येतो आणि टोचा मारतो तरीही धन्य होतो??🤔
शाळेतून घरी येताना अख्ख्या रस्त्याने माझ्या डोक्यात हाच विचार असायचा पण माझा बाबा स्वभावाने खूप कडक होता आणि त्याच्यासमोर विनाकारण उभं राहायची पण मला भीती वाटायची म्हणून मी हा प्रश्न कधीच कोणालाच विचारला नाय.. मग पुढे मला तो श्लोक समजला तो भाग वेगळा..😛 
पण मग त्यानंतर कुंभारगल्लीत गोरोबा काकांच्या मंदिरात मी बालवाडी शाळेत जायला लागली.. ती शाळा पण मला खूप आवडायची.. आणि रविवारी शाळा बंद आहे हे मी सांगून पण ऐकायची नाय म्हणून आईला मला शाळेत घेऊन जावं लागायचं.. रविवारीपण मी आईकडून डोक्यावर मस्त दोन नारळाच्या शेंड्या घालून आणि माझ्या आवडीचा स्कर्ट घालून शाळेत घेऊन जायला लावायची.. आणि मग असं रविवारच्या दिवशी पण माझी आई मला शाळेत घेऊन जायची तेव्हा त्या कुंभार गल्लीतल्या बायका दात काढायच्या..🙄 मग आई मला शाळेचं कुलूप दाखवायची आणि घरी घेऊन यायची.. 
पण ना, मी शाळेत बसलेली असताना माझा आप्पा म्हणजे माझा काका शाळेच्या खिडकीतून मला 'मने, मने' असा आवाज द्यायचा तेव्हा मला जाम राग यायचा.. मी त्याला म्हणायची की असं शाळा चालू असताना तू मला तिकडं येऊन आवाज नको देत जाऊ बाबा, मला नाय आवडत.. पण तो कुठं ऐकायचा..😏
एकदा शाळेत असताना माझं दप्तर हरवलं..😑 म्हणजे मी माझ्या समोरच घेऊन बसले होते की.. पण अचानक कुठं गेलं काय माहीत.. बरं दप्तरात नवीन पाटी होती ती हरवली म्हणून वेगळी भीती आणि घरी गेल्यावर बाबासमोर कसं उभं राहू हा वेगळाच धाक..😓 बाई शिकवताना पण माझी नजर वर्गभर भिरभिरत होती की कुठंतरी माझं दप्तर मिळेल.. पण काय दिसलं नाय.. मग शेवटी आपला अश्रूंचा बांध फुटला आणि मी मोठमोठ्याने रडायला लागले..😭 आमच्या बाईंना समजेना की अचानक मला काय झालंय.. मला तर बाबा आठवूनच अजून मोठ्याने रडायला येत होतं.. पण रडता रडता बाईंना सांगितलं की माझं दप्तर हरवलंय.. मग बाईंनी पण शोधलं.. तरीही सापडेना.. मग बाईंनी सगळ्यांना उठवलं तेव्हा माझ्या पुढे जो मुलगा बसला होता तो माझ्याच दप्तरावर बसलेला होता..😵 माकड्या..😡 असा राग आला होता मला त्याचा कायच सांगू.. म्हणजे एकतर नुसता बाबाचा चेहरा समोर येत होता आणि दुसरं म्हणजे रडून रडून माझं काजळ आणि पावडर पुसली गेली होती.. शी बाई..!!😩 
पण एवढं सगळं होऊन पण मी घरी चकार शब्दपण काढला नाय..😷 
मग पुढे..
क्रमशः
.
.
.
.
.
.
.
प्राchi..💞
12/05/2020

(फोटोत तो पांढऱ्या शर्टमध्ये माझा बाबा..❣️)

Friday, 29 November 2019

पुन्हा 'ती'च..



कितीदा तुम्ही न्यूज बनवणार आणि कितीदा मोर्चे काढणार..??
मुलींना अंगभर कपडे घालायला शिकवणार..?
नजर खाली घालून चालायला शिकवणार आणि,
सहन करायला शिकवणार..??
कधी आपल्या मुलांना शिकवलंय का कि रस्त्याने चालणारी मुलगी तुमच्या बापाची प्रॉपर्टी नसते..
ती कोणाची तरी बहीण, मुलगी, आई, बायको आणि प्रेयसीही असते..
कोणाच्यातरी घरातली जबाबदार व्यक्ती असते..
आणि शरीराची भावना इतकी विक्राळ व्हावी कि त्या भावनेला कुठलीच मर्यादा राहू नये,
इतकंच नव्हे तर जिवंतपणी जाळून टाकावं..??
म्हणजे जेव्हा केव्हा अशी घटना घडते तेव्हा प्रचंड संताप होतो..
सगळ्यांचाच..
मी म्हणत नाहीये कि पुरुषसत्ताक समाज पुरुषांनीच बनवलाय असं..
यात सहन करणारी प्रत्येक स्त्रीही तेवढीच गुन्हेगार आहे..
आणि त्याहूनही, त्या महिला गुन्हेगार आहेत ज्या अशा पुरुषी परंपरांना साथ देतात आणि सबलीकरण करतात..
जेव्हा कोणी एखादा गुन्हा करतो तेव्हा 'त्याच्या' गुन्ह्याबाबत न बोलता 'तिच्या' कपड्यांबाबत, वयाबाबत, वेळ-काळाबाबत
आणि तिच्या सवयींबाबत बोललं जातं.. का..??
कधी ऐकलंय का कि कुणी मुलगा बनियन आणि शॉर्ट्सवर फिरतोय म्हणून मुलींच्या कुठल्याही टोळीने त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं??
आपल्या घरातही बाबा आणि भाऊ घरात उघडे फिरत असतात, पण कधी मुलींची नजर फिरलीये का..??
मग मुलांच्याच भावना का चाळवतात..??
ती ना, छोटेच कपडे घालायची.. ती तर ओठ लाल करून आणि मेकअपच करून फिरायची.. आणि हि तर काय, मुलांसोबत फिरायची..
म्हणून ह्यांच्यासोबत असं झालं..
अरे मग ज्या डायपरमध्ये होत्या त्यांनी काय केलं होतं..?? आणि त्या पाय लटपटत चालणाऱ्या आजीने कसलं प्रदर्शन केलं होतं रे..??
मला त्या प्रत्येक व्यक्तीविषयी संताप आहे जी व्यक्ती मुलींचे मापदंड ठरवते..
दोष जर मुलींमध्ये असता तर मुली बलात्कार करत फिरल्या असत्या..
पण इथं प्रश्न आहे माणसाला माणूस म्हणून बघण्याचा..
ज्याचा कोणीही विचार करत नाय..
मुळात प्रेम काय आहे हे ज्याला समजतं ती व्यक्ती कधीच या टोकापर्यंत येत नसते..
आणि जी व्यक्ती येते त्या व्यक्तीला ती भावना समजलेलीच नसते..
हे सगळं लिहिताना आणि विचार करताना माझा कितीदा संतापाने डोळ्यात पाणी आलंय..
माहित नाय..
काल 'ती' होती..
आजही 'कोणी' असेल..
उद्या 'मी'ही असू शकेल..
पण मला भीती नाहीए.. जितक्या आत्मविश्वासाने मी काल रस्त्याने जात होते तितक्याच ताकदीने मी आजही चालत राहीन आणि माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक मुलीला ही हिंमत देण्याचा प्रयत्न करीन..
आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत असल्या घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांवर थुंकत राहीन..
लिहीत राहीन आणि यांच्या नसलेल्या इज्जतीचे ताशेरे उडवून अघोरी आनंद घेत राहीन..
कधी माझ्यावर जर असा प्रसंग ओढावलाच तर शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन, मी लढतच राहीन..
तुम्हीही बघा, विचार करा, ठरवा..
आणि प्लिज, नेहमीप्रमाणे फक्त विचार करू नका ना..
कमीत कमी आपल्या आसपास असलेल्या मुलाशी किंवा पुरुषाशी याबाबत बोला..
explain करा..
समजावून सांगा..
ही फक्त पोलिसांची किंवा समाजसेवकांची किंवा शासनाची जबाबदारी नाहीये..
कुठल्या ना कुठल्या मुलीशी कुठला ना कुठला संबंध असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ही नैतिक जबाबदारी आहे..
व्यक्त होत राहा.. मन मोकळं करत राहा..
हा आपलाच समाज आहे आणि इथं आपल्यालाच राहायचंय..
मग सुरक्षित आणि सेफ राहुयात ना..
.
.
.
.
प्राchi.. 💞

Monday, 25 November 2019

गोष्ट तरुणाईची..


भारत हा युवकांचा देश आहे असे जगभरात समजले जाते.. यात तथ्यही आहेच.. ढोबळमानाने १५ ते ३५ वर्ष वयोगटातील स्त्री पुरुषांना आपण युवा म्हणू शकतो.. आणि भारतातली दर तिसरी व्यक्ती हि युवा आहे..येत्या २ वर्षांत म्हणजेच पुढील जनगणनेदरम्यान भारतातील युवकांची संख्या ६०० दशलक्षांपर्यंत पोचलेली असेल.. आणि भारत हा जगातला सर्वात जास्त तरुणांचा देश म्हणून ओळखला जाईल.. यातील ६४ % लोकसंख्या हि कमावती असेल..
आता बघायला गेलं तर उत्पन्न मिळवायला लागणारी औपचारिक कौशल्ये केरळ राज्यातील युवकांकडे आणि त्यामागोमाग महाराष्ट्र, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील युवकांकडे आहेत.. पण याविरुद्ध या युवकांना रोजगाराच्या किती संधी मिळतात हे आपल्याला माहित आहेच.. भारत हा विकसनशील देश असल्याने इथे सुधारणा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि यातून युवकांना मोठा रोजगार मिळू शकतो.. परंतु वाढलेल्या शिक्षणाच्या किमती, शिक्षणाबद्दल अनास्था, वयाच्या १८ व्या वर्षांनंतरही आईवडिलांनी शिक्षणासाठी मदत करावी हा अट्टाहास आणि यातून राहणारं अर्धवट शिक्षण, समवयीन मित्र मैत्रिणींची वाईट संगत,मोफत आणि स्वस्त नेट आणि त्यामुळे वाढलेला इंटरनेटचा अतिवापर, व्यसनाधीनता, राजकारणाकडे जाणूनबुजून केलेलं दुर्लक्ष, अयोग्य आहार आणि यातूनच अनेमियासारख्या आजारांमधून येणारा अशक्तपणा आणि उदासीनता, लैंगिकतेबद्दल मिळवलेली अपूर्ण माहिती आणि त्यातून उद्भवलेले जीवघेणे आजार, आणि बरंच काही.. हि यादी खूप मोठी आहे आणि याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाहीत.. जितकी भारताची लोकसंख्या आहे त्याहीपेक्षा जास्त समस्या या देशात आहेत.. पण म्हणून प्रत्येक वेळी दुसऱ्या कोणाकडे बोट दाखवून आपण आपल्या अकार्यक्षमतेला झाकू शकत नाहीत.. या सर्वांचं उत्तर आपल्याकडेच आहे.. यातला कुठलाही असा प्रश्न नाही जो आपण सोडवू शकत नाहीत..
यातल्या बऱ्याच मोठ्या युवकवर्गाला आपले अधिकार काय आहेत याचीही जाणीव नाही असंही बऱ्याचदा दिसून येतं.. आपण संयुक्त राष्ट्रांचा बालहक्क जाहीरनामा ११ डिसेंबर १९९२ रोजी स्वीकारला आणि बालकांच्या हक्कांप्रती जागरूक राहण्यासाठी आपल्या देशाने स्वाक्षरी केली. परंतु आजही फक्त महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी राजस्थान आणि बिहार नंतर महाराष्ट्र बालविवाहामध्ये अग्रेसर आहे आणि हे युनिसेफच्या अभ्यासातून निदर्शनास आलंय.. अजूनही आपले आई बाबा आपल्या मुलींना 'लोकं काय म्हणतील' या भीतीने घराबाहेर शिक्षणासाठी पाठवत नाहीत आणि मुलगी पळून जाऊ नये म्हणून बालपणी विवाह लावून देतात.. आमच्याकडे बालकामगार काम करत नाहीत असं आपण खूप वेळा पाहतो पण ते चहाच्या टपरीवर काम करणारं छोटू त्याच्या घरातला कमावता पुरुष असतो.. ही भारतातली सत्य परिस्थिती आहे!! आजही आपल्या देशात मुली घरातही सुरक्षित नाहीयेत, मुलींवर होणारे बलात्कार हे ९५% ओळखीच्या लोकांकडून होतात मग बाहेरचा तर प्रश्नच सोडा.. मुलींनी कशे कपडे घालायला हवेत हे आजही इथले बाबा बुवा ठरवतात आणि त्यांच्या या वाक्यांवर लाफ्टर पडतात.. इथं वर्णभेदही होतो आणि बायका म्हणजे पायातल्या चपला म्हणून संबोधल्या जातात.. किळसवाणं आहे किनई हे??  
भारत कसा असायला हवा हे कुण्या बाबाने सांगायची गरजच पडू नये इतकं आजच्या युवकाने सक्षम असायला हवं.. यासाठी गरज आहे ती आपला दृष्टिकोन बदलण्याची आणि स्वतः पासून बदल घडवण्याची.. यासाठी पुन्हा आपल्याला वेगळी डिग्री घेण्याची मुळीच गरज नाहीये.. गरज आहे ती फक्त माणसाला माणूस म्हणून बघण्याची.. मित्रांनो, आपल्या देशात बदल घडवायला देव अवतरणार नाहीये.. हि जबाबदारी आपलीच आहे आणि सुरुवातही आपल्यालाच करायचीय.. आपल्याला किमान कायदेव्यवस्था माहित असायला हवी, एखादी चुकीची गोष्ट आसपास घडत असताना एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला काय करता येईल याचा विचार करता यायला हवा.. कुठल्या समस्यांसाठी कुणाकडे तक्रार करायची किमान एवढं तरी माहित असावं.. चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवता यायला हवा आणि नाहीच काही जमलं तर कमीत कमी समोरच्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर तरी ठेवता यावा..
आपण युवक म्हणून आपल्या देशाकडून जर आपल्याला काही अपेक्षा असतील तर त्याआधी समजून घ्या कि तुमच्यासाठी इथं लोकांनी जीव गमावलेत आणि आणि तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य उपभोगायला मिळतंय.. आज देशाची राजकीय परिस्थिती पाहता देशाला सक्षम आणि हुशार नेतृत्त्वाची गरज आहे आणि अशी गरज पूर्ण करू शकणारं एकही जबाबदार नेतृत्व भारताला मिळू नये म्हणजे केवढी ही उपेक्षा भारताची!! इथल्या युवकाला आज योग्य अशा नेत्याची गरज आहे जो भारताला विकसित राष्ट्र म्हणून नवी ओळख देईल.. हे जेव्हा होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आपण आपल्यात बदल घडवायला हवेत.. आपण युवक हि आपल्या देशाची खरी ताकद आहोत हे जरी आपण विसरलो असलो तरी किमान आता तरी जागे होऊ या.. समाजकारण आणि राजकारण समजून घेतल्याशिवाय आपल्याकडे प्रगतीचा दुसरा पर्याय नाही आणि देशात प्रत्येक मुलगा मुलगी जेव्हा एकमेकांना समान समजून हि मोहीम हाती घेतील तेव्हा आपल्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये हे वेगळं सांगायची गरज नाहीये..

प्राchi.. 💞

Wednesday, 24 January 2018

गुंतता हृदय हे..

तसं त्याचं प्रेम नव्हतंच तिच्यावर कधी.. बाकीच्या सामान्य मुळींसारखीच होती ती दिसायला पण डोळे फारच बोलके.. अन् परिस्थितीपुढे हतबल तिचं कुटुंब.. हेच हेरून त्यानं डाव साधला होता.. दोन दिवसांच्या ओळखीत तो तिच्यावर हक्क दाखवायला लागला होता.. इतक्या हक्कानं कुणीतरी आपल्याशी बोलतंय म्हटल्यावर तीही सुखावून गेली होती.. खरं पाहता 'त म्हणता तपेलं' ओळखणाऱ्या मुलींच्या जमान्यात ती ज्ञानाने मागासच होती.. म्हणून तर त्याच्या वासनेला प्रेम समजून बसली.. परंतु 'असलं' काही करण्याची तिची बिलकुल मानसिकता नव्हती.. आणि खरं तर आजच्या फास्ट फॉरवर्ड काळात अशा साध्या मुली असतात यावर कुणाचाही विश्वास बसणं अशक्यप्राय गोष्ट.. एकाच महिन्याच्या ओळखीत त्याच्याकडून होणारी धमकिबाजी आणि मारहाण (आणि नको असलेलं प्रेमसुध्दा) यामुळं ती हादरली होती.. त्यात वडिलांनी साथ सोडल्याने आईची काम करताना होणारी धावपळ, चारही मुलींची समाजाकडून होणारी अवहेलना आणि पोटाची खळगी भरण्यासाठी आलेलं असहायपण.. तिच्या घरचं ते विदारक चित्र पाहून मुळापासून हादरले होते मी.. कशी या मायलेकींना मदत करावी हेच सुचत नव्हतं.. त्या रात्री अगदी सुन्न डोक्याने मी घरी पोचले आणि रात्रभर तिचाच विचार करत राहिले.. 

काय चूक होती त्या बिचारीची या सगळ्या प्रकारात..?? ती अबोल होती म्हणून की तिची परिस्थिती नव्हती म्हणून..?? की तिला पाठीराखा असा तिचा भाऊ किंवा बाप नव्हता म्हणून..?? खरंच मुलीचं शरीर इतकं स्वस्त असतं का की कुणीही आपल्या आश्वासक शब्दजालामध्ये गुंतवून तिला आपला गुलाम करेल..? कुठं गेला तो नाही म्हणण्याचा अधिकार अन् कुठं गेली ती स्त्री पुरुष समानता ? खरं तर तिच्या आयुष्यातल्या त्या सोनेरी क्षणांचा चुराडा केला होता त्यानं.. जीवनातले जे नाजूक गुलाबी क्षण तिनं तिच्या इच्छेने अनुभवायचे होते ते त्या वासनेने गिळंकृत करून टाकले होते.. तिच्या अश्रूंमधून आणि शब्दांमधून त्या धुंद क्षणाची किळसवाणी वर्णनं वेळोवेळी काळजाला चिरून जात होती.. आणि वास्तव तर फार भयानक असतं.. ते so called प्रेम आणि ते प्रेम मिळावं यासाठी समोरचा कसा प्रयत्न करेल हे समजणं तसं मुश्किलच आहे म्हणा.. एखादा तिच्यावर धाक दाखवेल, बळजबरी करेल, धमक्या देईल.. याचा विरोध करणं हे तसं सोप्पं असतं.. परंतु तिच्याशी गोड बोलून जवळीक साधणं, प्रेमानं स्पर्श करणं, तिला हवं नको ते देणं, आणि मग 'त्या' सुखाची मागणी करणं.. अशा वेळी ती मुलगी नाही म्हणू शकत नसते.. 

गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी..
हा प्रणयगंध परीमळे तुझ्या अंगाशी..

या इथे जाहला संगम दो सरितांचा..
प्राक्तनी अपुल्या योग तिथे प्रीतीचा..
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी..

दुर्दैवे आपण दुरावलो या देही..
सहवास संपता, डागळले ऋण तेही..
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी..

तेव्हा सर्व झुगारून देऊन जर ती त्याला आपलं सर्वस्व अर्पण करते तर ती चुकीची कशी असेल.. तिच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्यात ना.. यात गरज आहे ती समाजाने आपली मानसिकता बदलण्याची आणि आपल्या बेलगाम शुर वीरांना योग्य मार्गदर्शन करण्याची.. यासाठी किती जण माझ्या या विचारांत सहमत असतील ते माहीत नाही.. लेकीन उम्मीद पे दुनिया कायम हैं..
आणि कहाणीची माझी मुख्य पात्र अजूनही संभ्रमात आहे.. मी तर आहेच तिच्यासोबत.. बाकी बघुयात कोण कोण येतंय आमच्या सोबतीला.. 

प्राchi
२२/१/२०१८